२०२३-०८-०५ समालोचन - विदूषी कुमुदिनी काटदरे गुरुपौर्णिमा उत्सव दि ५ व ६ ऑगस्ट २०२३
Note: To be able to read this Marathi text, please ensure you have set View->Character Encoding to Unicode (UTF-8) in your browser. पूर्वपीठिकाभारतीय परंपरेत सर्व शिष्यांतर्फे 'गुरुपौर्णिमा' हा उत्सव, चांद्रमासीय पंचांगाप्रमाणे आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो. शिष्याचा विषय कोणताही असो, मातीची मडकी तयार करण्यापसून ते थेट आध्यात्मिक प्रगती साधण्यापर्यंत - त्यात मध्ये गणित व संगीतही आलेच - हा दिवस महत्वाचा असतो. हा दिवस असतो कृतज्ञतेचा, हृद्य आठवणींचा, गुरूबंधू - भगिनींच्या गाठी-भेटींचा, गोड-धोडाचा, तसेच शिकलेली कला, विद्या किती आत्मसात केली हे आजमावण्याचा. माझ्या महितीतले बहुतांश कला शिक्षक/गुरू हे नम्र भावनेने सवत:ला गुरू न म्हणवता, आपल्या गुरुपरंपरेतल्या साखळीतला एक दुवा म्हणून स्वत:कडे बघतात. त्या दान-यज्ञातील एक आहुती म्हणून स्वत:च्या ज्ञान-दानाच्या कार्याकडे बघतात. जे विश्वव्यापी सर्वज्ञ गुरूतत्व, अज्ञानाच्या अंधकाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे कार्य करते त्याचे, म्हणजेच सर्व ज्ञानाची गंगोत्री असणाऱ्या आदिगुरू शिवशंकराचे, एक समजायला सोपे स्वरूप म्हणून शिष्यवर्ग आपल्या मनुष्यरूपी गुरूंकडे पहात असतो व त्यांना नमन करत असतो, गुरूपूजन करत असतो. या वर्षी जयपूर गायन परंपरेतल्या गुरू, वाग्गेयकार विदूषी कुमुदिनी काटदरे यांच्या शिष्यवर्गाचा कार्यक्रम दि ५ व ६ ऑगस्ट ला संपन्न झाला. त्यांच्या कन्या व शिष्या धनश्री घाटे यांच्या घरी आयोजन केले होते. बैठकीत कुमूदताईंच्या गुरुंचे म्हणजे गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्या शिष्या विदूषी कमलताई तांबे व उस्ताद भुर्जीखान साहेब यांचे शिष्य मधुसूदन कानेटकर यांची छायाचित्रे स्थापित व फुलांनी सुशोभित होती. असे कार्यक्रम अत्यंत घरगुती वातावरणात व अनेक वर्षांचा ऋणानुबंध असलेल्या, एका छत्रा खाली ज्यांच्या सोबत एकत्र सांगीतिक प्रगती केली अशा आपुलकीच्या माणसांसोबत होत असल्याने एक वेगळांच आनंदी माहोल असतो. तसेच घरच्या बैठकीच्या खोलीत, सभागृहापेक्षा खूप कमी जागेत, कलाकाराच्या जवळ दाटीवाटीने बसलेल्या श्रोत्यांशी कलात्मक जवळीक चांगली साधली जाते. कलाकारचं सांगणं व श्रोत्यांचे अभिप्राय यांची देवणघेवाण अधिक चांगली होते व कलाकाराला व पर्यायाने कलेच्या उत्तम आविष्काराला पूरक ठरते. पारंपारिक वातावरणाचं अजून एक वैशिष्ठ्य असतं ते म्हणजे प्रत्यक्ष तानपुरा साथ. कलाकार एक किंवा दोन तानपुरे व ते वजवणारे शिष्य साथीला घेतात. शिष्य तयारीचे असतील तर ते गायन साथ ही करतात. तानपुरे सुरात जुळवण्याची विषेश दक्षता घेतलेली असते. अधुनिक काळातला इलेकट्रॉनिक अथवा मोबाइल अॅप चा तानपुरा असतोच असं नाही, आणि असला तरी संदर्भ म्हणजेच रेफरेन्स पुरता. मैफलीत असे प्रत्यक्ष तानपुरे वाजत असतील तर वातावरण त्याने भारून जातं. साथीला गाणाऱ्या शिष्यांना आपल्या गुरूंकडून मैफिलीत ‘लाईव’ शिकता येतं. त्यात गायनाबरोबर गायनाचं प्रस्तुतीकरणही शिकत येतं. मंच प्रदर्शनाची सवय होते, भीती (स्टेज फ्राइट) रहात नाही. योग्य वेळीला योग्य प्रमाणात केलेले पूरक आलाप, ताना, तसेच गुरूंचे आलाप व ताना संपताना मध्य व द्रुत लयीत त्यांच्या बरोबर गायलेला मुखडा, लय बदलत असताना तबला साथीदाराच्या वादनाला आधार व संदर्भ देण्यासाठी वारंवार गायलेली चीजेची पहिली ओळ, या व अशा अनेक प्रकारच्या शिष्यांच्या पूरक साथीने गाणे भारदस्त होते. गाणे एकट्या कलाकाराचं प्रस्तुतीकरण न राहता, मुख्य कलाकाराच्या पुढाकाराने केलेले सामुहिक सादरीकरण (टीम वर्क) होते, व श्रोत्यांना अधिक आनंद देणारे, अधिक परिणामकारक होते. या कार्यक्रमात हे सर्व अनुभवता आले. तसेच, या कार्यक्रमात प्रामुख्याने जयपूर परंपरेचा शिष्यवर्ग असल्याने या परंपरेची वैशिष्ठ्ये अनुभवता आली. विलंबित त्रितालातील अनेक बंदिशी, पारंपारिक रचना, स्पष्ट शब्दोच्चार, स्पष्ट आकारयुक्त गायन, तसेच लांब, पल्लेदार, खास आकृतिबंध व संरचना असलेल्या ताना, विलंबित लयीत विस्तार करायच्या आधी स्थायी व अंतरा दोन्ही गाणे, हे सर्व वेगवेगळ्या कलाकारांकडून वेगवेगळ्या प्रमाणात अनुभवता आले. कुमूदताईंनी रचलेल्या विविध तालातल्या व लयींच्या बंदिशी ऐकायला मिळाल्या हे या कार्यक्रमाची अजून एक खास बात. सत्र १पहिले सत्र शनिवार दि. ५ रोजी सायं ४ ला नियोजित वेळेवर सुरू झाले. प्रथम बिनता फडके यांनी राग पूर्वा कल्याण सादर केला ज्यातील सर्व बंदिशी कुमूद ताईंच्या आहेत.
या नंतर अमृता कुलकर्णी यांनी राग मधुवंती सादर केला.
या नंतर मैत्रेयी बर्वे यांनी राग तिलंग प्रस्तुत केला.
या नंतर धनश्री घाटे यांनी राग मुलतानी प्रस्तुत केला.
जयपूर परंपरेतल्या (कमलताईंच्या / कुमुदिनीताईंच्या) शिष्या, इन्दूर च्या शुभदा मराठे यांचे काही महिन्यांपूर्वी दु:खद निधन झाले. त्यांचा या कार्यक्रमात नेहमी सहभाग असे व या ही वेळेला नियोजित होता. धनश्री घाटे यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या व त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांची जोग रागातील ‘दरस बिना तरसे अखिया’ (मध्य लय त्रिताल) याची यू ट्यूब वरील क्लिप सर्वांनी टीव्ही वर पाहिली. या नंतर किशोरी कुलकर्णी यांनी सतारीवर राग पूरिया धनाश्री प्रस्तुत केला. त्यांनी वाद्य वादन शैली (instrumental style) प्रमाणे आलाप, जोड, 'पायलिया झनकार' ही परांपारिक गत व मग झाला, असे सर्व प्रस्तुत केले. त्यांची सतार अत्यंत सुरेल वाजली. त्यांनी लयदार व अनेक तिहाई युक्त असे वादन केले. त्यांनी शेवट एका चक्रदार तिहाई ने केला. एकूण सादरिकरण खूप प्रभावी झाले. या नंतर निनाद देव यांनी राग तिलक कामोद प्रस्तुत केला.
शेवटी मंजिरी आलेगावकर यांनी राग बागेश्री प्रस्तुत केला.
त्यांनीही स्त्री व पुरुष असे दोन तानपुरा साथीदार घेतले होते, दोघांनाही माईक दिला होता व दोघेही योग्य पट्टीत साथ करत होते. पूर्वी पुरुष गायकांना पुरुष साथीदार व स्त्री गायकांना स्त्री साथीदार अशी पद्धत जास्त प्रचलित होती. स्त्री व पुरुष असे मिश्र साथीदार क्वचित दिसायची. आजकाल अशी साथ बऱ्याच् प्रमाणात दिसते. गुरू दोन्ही शिष्यांना तालीम देतात हे त्यांचे कसब आहे व शिष्य आपल्यापेक्षा वेगळ्या पट्टीत चांगली साथ करतात हे त्यांचे कसब आहे. जरी वेगळ्या पट्टीत गाताना सर्व सप्तकांत संचार करता येत नसला तरी एकूण कलाविष्कारामध्ये याने काही उणेपण येते असे वाटत नाही, उलट वैविध्यतेची भरच पडते. शेवटी त्यांनी 'गुरूजी' हे निर्गुणी भजन सादर केले. या भजनातील स्वर समूहांचा जणु न्यास असणारा कोमल रिषभ निव्वळ जादुई आहे. या भजनाला सिद्ध गानऋषींची उज्ज्वल परंपरा आहे. पं कुमार गंधर्व, वि. वीणा सहस्रबुद्धे यांची आठवण नाही झाली तरच नवल. मंजिरी ताईंच्या गायनाने श्रोतावर्गाचे हृदय दाटून आले, तर काहींच्या डोळ्यातून ते प्रकटही झाले. गुरुसमर्पणाने भारलेली मने पहिल्या सत्राचा शेवट करून दुसऱ्या सत्रासाठी आतुर होऊन विश्राम घेती झाली.
सत्र १दुसरे सत्र रविवार दि. ६ रोजी सकाळी १० ला नियोजित वेळेवर सुरू झाले.प्रथम साधना इतराज यांनी राग अहिर भैरव सादर केला.
या नंतर शोभा अरगडे यांनी राग यमन मधील दोन भजने सादर केली.
या नंतर नीता मुतालिक यांनी राग जौनपुरी प्रस्तुत केला.
या नंतर त्यांनी मिश्र काफी रागातील बुंदेलखंडी ‘लेद’ गायकीतील रचना गायली. ही रचना शुभदा पराडकरांनी गायल्याची आठवण सांगितली. सहा किंवा आठ कडवी असलेली रचना असूनही मधली कडवी जलद लयीत असल्याने गाऊन लवकर झाली. एकूण सादरीकरण छान झाले. या नंतर अंजली मालकर यांनी राग मिया मल्हार प्रस्तुत केला.
या नंतर पद्मिनी दांडेकर यांनी राग भूपाल तोडी प्रस्तुत केला.
इथे मला माझे प्रथम गुरूजी पं. राम माटे यांची खूप आठवण झाली. आमच्या सर्व कार्यक्रमांत रागांच्या प्रस्तुतीकरणाचा क्रम रागांच्या समयानुसारच असायचा. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे एक प्रमुख वैशिष्ठ्य म्हणजे राग-समय-चक्र. प्रत्येक रागाला त्याची स्वत:ची अशी वेळ आहे, व तो त्याच वेळी गायला जातो. त्यामुळे राग सादरिकरणाची वेळ व रागची वेळ ही सारखी असते. तसेच आधीची वेळ असलेला राग हा आधी गायला जातो व नंतरची वेळ असलेलेला राग हा नंतर सादर केला जातो. असे केल्यामुळे तो रागच नाही, तर संपूर्ण कार्यक्रम जास्त परिणामकारक होतो. काही रागांचे समय सारखे असतात व असे राग एकमेकांच्या आधीही व नंतरही गायले जाऊ शकतात. या तत्वाची काळजी घेऊन योजलेला, सादर केलेला कार्यक्रम, श्रोत्यांना चढत्या क्रमाने आनंद देतो, रंगतो, याचा अनुभव आपण प्रयोग करून स्वत: घेऊ शकतो. अर्थातच, यासाठी बाकी निकषही असतात, गुरूंनी कार्यक्रम मांडणीमागचा केलेला विचार, गाणारे कलाकार यांची ज्येष्ठता, संपूर्ण कार्यक्रमाला गुंफणारं विशिष्ठ सूत्र आहे का आणि असेल तर काय आहे, एखाद्या गाण्याच्या आधी व नंतर गायन आहे अथवा वाद्य वादन आहे, वाद्य कोणते आहे, एकूण किती कलाकार आहेत व प्रत्येकाला दिलेली वेळ किती आहे, विशिष्ठ साथीदारांची उपलब्धता, या व अशा अनेक बाबी विचारात घेतल्या जातात. इथे जवळ जवळ सारंग ची वेळ झाली होती व या आधीचा मिया मल्हार छान झाला होता. या पार्श्वभूमीवर , भूपाल तोडी जर तोडीच्या वेळेनुसार थोडा आधी प्रस्तुत झाला असता, तर रागाचा असर जास्त जाणवला असता, असे या सर्व विचारापासून अनभिज्ञ असलेला एक श्रोता म्हणून वाटले. असो. यांना डॅा. अंजली दाणी - संवादिनी व सतीश कानडे तबला अशी साथ होती. बाकी सर्व कलाकारांना, दोन्ही दिवस गंगाधर शिंदे - पेटी व पुष्कर महाजन - तबला यांनी छान साथ केली. वेगवेगळ्या कलाकारांबरोबर वेगवेगळ्या तालात व लयीत, शास्त्रीयच नाही तर भजने, भावगीते व लोकसंगीतही समर्थ पणे वाजवल्या बद्दल पुष्कर महाजन यांचे विशेष कौतुक. नितिन पाटील यांनी ध्वनि व्यवस्था उत्तम पाहिली. सर्व साथीदारंचे कुमूदताईंच्या हस्ते पुष्प देऊन कौतुक करण्यात आले. शेवटी मधुवंती देव यांनी राग मधमाद सारंग प्रस्तुत केला.
गुरू नानक यांचं कुमुदताई यांनी चाल लावलेल्या भैरवी भजनाने दोन दिवस उत्तमपणे आयोजलेला कार्यक्रम संपन्न झाला. गाणं संपलं खरं, पण कोणाची उठायची इच्छा होत नव्हती. गुरूस्मरणाने भारलेलं सूरमय वातावरण बदलावं असं कोणालाच वाटत नव्हतं. काही क्षणांच्या शांततेनंतर मग सर्व श्रोत्याच्या भूमिकेतून बाहेर आले. गप्पांतून गेल्या दोन दिवसांचा धावता आढावा घेण्यात आला. गाणं सादर केलेल्या कलाकारांबरोबर अभिनंदन व अभिप्राय यांची देवाण-घेवाण झाली. गुरू कुमुदिनीताईंबरोबर छायाचित्र घेण्यात आली. अशा प्रकारे आनंदात सर्वांची पाउले आपापल्या घराकडे वळली.
Tags: Indian, Classical, Music, Raga, Vidushi Kumumdini Katadare All comments sent via email to this address will be moderated and posted here. Assuming you won't want to be spammed, I will not share your email address or web address unless you explicitly mention in the email :) |
Message in Public Interest
|
Human. Professional. Technologist. Musician. Naturophile. Linguaphile. Traveller. Philosopher. Friend. Don't-Worry-Be-Happy-ist.